Thursday, July 14, 2011

आणि मला हसू आले...

दोन लहान मुले भांडत होती. दोघांपैकी एक जन थोडा शहाणा, शांत स्वभावाचा होता आणि दुसरा थोडा हट्टी, उर्मट होता. हट्टी-उर्मट मुलगा शहाण्याची नेहमी खोड काढायचा. पण शहाणा त्याच्या शांत स्वभावामुळे त्याला काही प्रत्युत्तर द्यायचा नाही. त्या उर्मट मुलाने एक खोडी काढली कि हट्टी मुलगा त्याचे नाव शिक्षकांना सांगीन अशी धमकी द्यायचा. उर्मट मुलाला हे लवकरच समजले कि आपले शिक्षक त्यांच्यात कामात गुंतल्यामुळे त्यांना आपल्याकडे लक्ष्य द्यायला वेळ नाही. त्यामुळे तो आणखी खोड्या करायचा. कधी शहाण्याला तापली मार, कधी त्याचे केस ओढ तर कधी पाठीत गुद्दा मार. आणि तो शहाणा त्याच्या शांत स्वभावाला जागून काही प्रतिकार करायचा नाही. तो फक्त उर्मट मुलाला समजून सांगायचा प्रयत्न करायचा. एक दोन वेळेस शिव्या पण देऊन पाहायचा. पण उर्मट मुलाला कळले होते कि काही झाले तरी हा शहाणा पोरगा त्याला मारणार बिरणार काही नाही. मग तो खोड्या करायला सोकला.

दरम्यान तो शहाणा मुलगा त्याचे गाऱ्हाणे घेऊन शेजार्या पाजार्यांकडे पण जाऊ लागला. लोकही त्याचे मागणे ऐकून घ्यायचे. त्याला धीर द्यायचे. पण लोकांना हे माहित होते कि उर्मट मुलाला समजावण्यात काही अर्थ नाही. तो उर्मट मुलगा मूर्ख असल्यामुळे त्याला कितीही समजावले तरीही पालथ्या घागरीवर पाणी.

शेजारी पाजारी सुधा उर्मट मुलाशी बिचकून होते. त्या मुलाच्या काही गुंडांशी ओळखी पण होत्या. कोणाला पण नसती ब्याद मागे लागून घ्यायची नवती. एकदा तर शिक्षकांचे घर काही गुंडांनी फोडले. आणि त्या गुंडांचा म्होरक्या उर्मट मुलाच्या घरी लपून बसला. शिक्षकांनी बरेच दिवस त्याला शोधायचा प्रयत्न केला. उर्मट मुलाने पण त्या गुंडाला शोधण्याचा प्रयत्न करण्याचा आव आणला. पण पूर्ण वेळ तो मनातल्या मनात हसत होता लोकांच्या भोळ्यापणावर.

शेवटी शिक्षकांना माहिती कळली कि त्या गुंडांचा म्होरक्या हा उर्मट मुलाच्या घरी लपून आहे. आणि इतकेच नाही तर उर्मट मुलगा त्याला स्वताहून पोसत आहे. तो कुणाच्या हाती लागणार नाही याची काळगी पण तो घेत आहे.

शिक्षकांना शहाण्या आणि उर्मट मुलातील घडणार्या गोष्टी माहित होत्या. त्यांना हे पण माहित होता कि उर्मट मुलगा शब्दाने ऐकणार्यापैकी नाही. त्यावेळी त्यांना शहाण्या मुलाची कीव आली पण ती वेळ शहाण्या मुलाची कीव करण्याची नवती हे त्यांना माहित होते. ती वेळ होती योग्य पाऊले उचलण्याची. मग शिक्षकांनी उर्मट मुलाला न सांगता त्याच्या घरात घुसून त्या गुंडांच्या म्होरक्याचा खरपूस समाचार घेतला. शेजारी पाजारी सगळे अवाक! शहाण्याला तर मेल्याहून मेल्यासारखे वाटले. लोकं त्याच्यावर छी थू करत होते. त्याच्या शांत स्वभावाला षंढपणा असं तोंडावर म्हणायला कोणी मागे पुढे पाहत नवतं. पण त्या शहाण्याने वेळ साधून उर्मट मुलाला काहीही धडा नाही शिकवला. मला तिथे हसू अनावर झाले.

गुंडांचा म्होरक्या घरीच सापडल्यामुळे उर्मट मुलाची चांगलीच नाचक्की झाली होती. पण त्याने गुंडांशी संबंद असण्याच्या शक्यतेला सपशेल नकार दिला. लोकांना पण त्याच्या गेंड्याच्या कातडीची कल्पना असल्यामुळे त्यांनीपण विषय नाही वाढवला. त्याच्या समोर काही नाही झाल्यासारखे सर्व जण दाखवत. पण त्याच्या मागे तोंडसुख घेत. पण त्याचा उर्मट मुलाच्या स्वभावात तिळमात्र बदल झाला नाही.

या दरम्यान उर्मट मुलामध्ये आणि शहाण्या मुलामध्ये फारसे काही घडले नाही. वातावरण असे कशी गरम होते कि उर्मट मुलाने सबुरीने घ्यायचे ठरवले. लोकही काही दिवसांनी विसरून गेले काय झाले ते. आणि थोड्याच दिवसात उर्मट मुलाचे पहिले पाध्ये पंचावन्न चालू झाले. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्याने पुन्हा शहाण्या मुलाची खोड काढली. यावेळी त्याच ठिकाणी मारले ज्या ठिकाणी शहाण्याला आधी बर्याच वेळी त्याने मारले होती. ती शहाण्यामुलाची अवघड जागा होती.

आजही तो शहाणा मुलगा उर्मट मुलाच्या त्रासाला कंटाळून फक्त राग व्यक्त करत आहे. उद्या तो शेजार्या-पाजार्यांकडे जाऊन तेच ते गाऱ्हाणे मांडणार आहे. कदाचित तो शिक्षकांकडेही जाईल, आणि पुन्हा ते शिक्षक त्याच्याकडे दुर्लक्ष करतील. आणि ह्या गोष्टी मी इतक्यांदा माझ्या डोळ्यादेखत घडताना पहिल्यात कि मला पुन्हा एकदा हसू आले.

2 comments:

  1. काहीच न करता आल्यावर माणूस हसत सुटतो
    मी पण या हसण्यात तुज्यासोबत आहे...
    आणखी बरेच जन असतील

    Excellent post
    Best one and complete

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...